भाषा संचालनालयामार्फत (पुर्वी एतदर्थ मंडळामार्फत) घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षाः-
१) या परीक्षा कोणाला देणे आवश्यक आहे:-
एतदर्थ मंडळामार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा ही महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील, आखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना व राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित अधिकारी तसेच अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. सदर परीक्षा ही प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांस शासकीय सेवेत रूजू झालेल्या दिनांकापासून ३ वर्षाच्या मुदतीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
एतदर्थ मंडळ बरखास्त ? आता भाषा संचालनालयाच्या परीक्षा!
सविस्तर माहितीसाठी: (getButton) #text=(CLICK HERE) #icon=(link) #color=(#1b2bde)
२) हिंदी भाषा परीक्षेतून सुट मिळण्याबाबतची तरतूदः-
१) माध्यमिक शालांत परीक्षा, हिंदी हा विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदीच्या निम्न व उच्च श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली आहे.
(पहा:- शासन निर्णय क्र. हिंभाप १०८०/१३१, दिनांक २५ मे, १९८१)
२) अ) ज्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची मातृभाषा हिंदी आहे त्यांना शासनाने विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आली आहे. मात्र मराठी मातृभाषा ठरविण्यासाठी जे निकष आहेत तेच निकष यासाठी लागू असतील.
ब) वर्ग ३ मधील तांत्रिक व बिगर तांत्रिक स्वरूपाच्या ज्या पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार त्या पदावरील नियुक्तीसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असण्याची गरज नाही अशा पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्यात आली आहे.
(पहा :- शासन निर्णय क्र. हिंभाप १०८१/३०५/वीस, दिनांक २१ जून, १९८२)
क) आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनी परिविक्षाधीन कालावधीत राष्ट्रभाषा हिंदीची परीक्षा उत्तीर्ण केली असल्यास महाराष्ट्र राज्यात वर्ग झालेल्या अधिकाऱ्यांना शासनाने विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षेतून दिनांक १७ डिसेंबर, १९८३ च्या पूर्वलक्षी प्रभावाने सूट देण्यात आली आहे.
(पहा:- शासन निर्णय क्र. हिंभाप १०८५/६८४/२०, दिनांक १९.११.१९८५)
ड) ज्या कर्मचाऱ्यांच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण होतील अशा कर्मचाऱ्याला विहित हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय राहील.
(पहा :- शासन निर्णय क्र. हिंभाप १९७६/२८, दिनांक १०.०६.१९७६)
३) हिंदी हा संयुक्त विषय घेऊन तसेच ५० अथवा १०० गुणांचा स्वतंत्र हिंदी विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेपेक्षा उच्चपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षेतून दिनांक ११ डिसेंबर, १९८३ पासून पूर्वलक्षी प्रभावाने सूट देण्यात आली आहे.
(पहा :- शासन निर्णय क्र. हिंभाप १०८३/१४४८/वीस, दिनांक १ डिसेंबर, १९८४)
परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास / सूट न मिळाल्यास दंडाबाबतची तरतूदः-
जे शासकीय कर्मचारी विहित मुदतीत किंवा त्याच्या वयाची ४५ वर्षे पूर्ण होईपर्यंत या परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांची वार्षिक वेतनवाढ विहित मुदत संपल्यानंतर ही परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत किंवा वयाची ४५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे सूट मिळेपर्यंत रोखण्यात येईल.
(पहा :- शासन निर्णय क्र. हिंभाप १९७६-२८, दि. १० जून १९७६)